नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेशादरम्यान नागपूर इथं झालेला तिसरा टी-ट्वेंटी सामना ३० धावांनी जिंकून भारतानं ही मालिकाही २-१ अशी जिंकली. सामन्यात बांगलादेशानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं पाच गड्यांच्या मोबदल्यात १७४ धावा केल्या. विजयासाठी १७५ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला बांगलादेशाचा संघ दीपक चहरच्या भेदक गोलंदाजीसमोर १९ षटकं आणि २ चेंडूंमध्ये केवळ १४४ धावांतच माघारी परतला.

चहरनं टी ट्वेंटी कारकिर्दीतली आजवरची सर्वोत्तम कामगिरी करत, हॅट्रिकसह केवळ ७ धावांच्या मोबदल्यात बांगलादेशाचे ६ गडी बाद केले. ही आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमधली कोणत्याही गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरीही ठरली आहे. याशिवाय चहर टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक करणारा पहिला भारतीय गोलंदाजही ठरला आहे. चहरलाच सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.