नवी दिल्ली : देशातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देऊन उत्तमोत्तम खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या ‘खेलो इंडिया’ या महत्वाकांक्षी  योजनेंतर्गत महाराष्ट्राला 8 प्रकल्पांसाठी 45 कोटी 93 लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने देशात क्रीडा क्षेत्राच्या विकास व प्रोत्साहनासाठी 2017 मध्ये ‘खेलो इंडिया’ ही महत्वाकांक्षी योजना सुरु करण्यात आली. या योजनेंतर्गत देशातील 28 राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी 173  प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या सर्व प्रकल्पांसाठी एकूण 1 हजार 226 कोटी 62 लाखांचा निधी मंजूर झाला असून आतापर्यंत एकूण 580 कोटी 62 लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात ‘खेलो इंडिया’ योजनेंतर्गत एकूण 8  प्रकल्पांसाठी 90 कोटी 41 लाख रुपये मंजूर झाले असून आतापर्यंत एकूण 45 कोटी 93 लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजू यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.