नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आहे. भोपाळ गॅस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ देशात दरवर्षी हा दिवस पाळला जातो. माद्रीद इथं आजपासून दोन आठवड्यांच्या आंतरराष्ट्रीय हवामान परिषदेला प्रारंभ झाला.

हवामान बदल थांबवण्याचे जागतिक प्रयत्न अपुरे पडत असून जागतिक तापमानवाढ, अशा धोक्याच्या बिंदूवर पोहोचू शकते, जिथून परतणं अवघड होईल असं प्रतिपादन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अॅशव्टिनिओ गुटेरस यांनी यावेळी केलं.

हवामानातील तीव्रतेसह तापमानवाढीचे परिणाम जगभरात जाणवू लागले आहेत. तापमानवाढ मर्यादेत राखण्यासाठी शास्त्रीय ज्ञान आणि तांत्रिक साधने जगाकडे आहेत, मात्र राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचं गुटेरस म्हणाले.

या परिषदेत 2015 च्या पॅरिस हवामान कराराच्या अंमलबजावणीसाठीच्या नियमांना अंतिम रुप देण्याचा प्रयत्न सुमारे 200 देशांचे प्रतिनिधी करणार आहेत.