नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजुर झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. हा भारतासाठी ऐतिहासिक दिवस आहे, तसंच करुणा आणि बंधुत्व या देशानं जपलेल्या मूल्यांचं प्रतिक आहे, असं मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

गेली अनेक वर्षे अत्याचार सहन करत असलेल्या लोकांच्या यातना या विधेयकामुळे संपुष्टात येतील, असंही मोदी यांनी ट्विटरवरच्या संदेशात म्हटलं आहे. या विधेयकाच्या बाजुनं मतदान केलेल्या संसदेच्या सर्व सदस्यांचेही मोदी यांनी आभार मानले आहेत. हे विधेयक संमत झाल्यामुळे करोडो पिडीत लोकांचं स्पप्न साकार झालं आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. या सर्व पिडीतांची सुरक्षा आणि त्यांचा सन्मान राखला जावा यासाठी दाखवलेल्या निर्धाराबद्दल शाह यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे, तसंच ठरावाला पाठिंबा देणाऱ्यांचे आभारही मानले आहेत.

नव्या कायद्यामुळे भारताच्या शेजारच्या देशांमधल्या, धार्मिक छळाला बळी पडलेल्या अल्पसंख्यांकांना आता सन्मानानं जगण्याची संधी मिळेल असं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. या ऐतिहासिक निर्णयासाठी जावडेकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची प्रशंसा केली आहे.