मुंबई : भारतातील विविध भागामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्यामुळे उपलब्ध पाण्याचे संवर्धन व परिरक्षण करणे आवश्यक असल्याने जलसंपदा, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालय, भारत सरकार यांचेकडून पाण्याचे संवर्धन व व्यवस्थापन करणेबाबत जनजागृती करण्यात येते. जलसंवर्धन व व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या विविध  क्षेत्रातील व्यक्ती, संस्था, कंपनी  यांना राष्ट्रीय जल पुरस्कार सन 2018 पासून देण्यात येतो. यावर्षीही  पात्र संस्थांनी 31 डिसेंबर, 2019 पर्यंत विहित नमुण्यात प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जलसंपदा विभागाचे उप सचिव र.ग.पराते यांनी केले आहे.

यावर्षी दुसरा राष्ट्रीय जल पुरस्कार 2019 देण्यात येणार आहे. यासाठी उत्कृष्ट राज्य, जिल्हा, नगरपरिषद, ग्रामपंचायत, शाळा, मोठे – मध्यम व लघु उद्योग, जल नियमन प्राधिकरण, जलयोद्धा, अशासकीय संघटना, पाणीवापर संस्था, दूरदर्शन कार्यक्रम, हिंदी, मराठी, इंग्रजी वर्तमानपत्रे असे एकूण 15 क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांनी परिपूर्ण नामांकन प्रस्ताव दिनांक 31 डिसेंबर, 2019 रोजी पर्यंत https// mygov.in या वेबसाईटवर दिलेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे tsmsml-cgwb@nic.in या ई-मेलवर केवळ ऑनलाईन सादर करावेत व  याबाबत अधिक माहिती व मार्गदर्शनाकरिता 022-22023096 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.