नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या पाच वर्षात ईशान्य भारतातला दहशतवाद, डावा कट्टरवाद आणि विद्रोहाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार वचनबद्ध आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली इथं गुप्तचर विभागाच्या 32 व्या  ज्ञानशताब्दी व्याख्यानमालेत बोलत होते.

राष्ट्रीय सुरक्षेला असलेली आव्हानं परतवून लावणं, विशेषतः दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावणं, तसंच ईशान्य भारतातला विद्रोह प्रभावीपणे हाताळण्यात गुप्तचर विभागानं, गेल्या पाच वर्षांत बजावलेल्या भूमिकेची शाह यांनी प्रशंसा केली. भूपृष्ठीय आणि सागरी सीमा सुरक्षित करणं हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं भारतापुढचं मोठं आव्हान आहे.

राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सुरक्षा तसंच गुप्तचर यंत्रणांमध्ये समन्वय असणं, गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीचं अचूक विश्लेषण करून कालबद्ध उपाययोजना करणं महत्वाचं असतं, असं शाह यांनी यावेळी सांगितलं.