पत्रकार दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शुभेच्छा

मुंबई :  पत्रकार दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याच्या पुढील वाटचालीत पत्रकार-माध्यमांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे असे त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे आपल्या संदेशात म्हणतात, तत्कालीन रत्नागिरी (आताच्या सिंधुदुर्ग) जिल्ह्यातील पोंभुर्ले या गावी जन्मलेल्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी लोकशिक्षण व ज्ञानप्रसारासाठी मराठी भाषेमध्ये वृत्तपत्र सुरू करून मराठी वृत्तपत्र व्यवसायाचा पाया घातला. त्यांनी सुरू केलेली गौरवशाली परंपरा वृद्धिंगत करण्याचे कार्य आज सर्वच माध्यमे जबाबदारीने करीत आहेत.

सामाजिक-राष्ट्रीय विकासात लोकहिताची भूमिका घेऊन प्रसंगी सरकारला जबाबदारीची जाणीवही करून देण्यात माध्यमे पुढाकार घेतात आणि म्हणूनच पत्रकारांनी अधिक विश्वासार्हता जपत राज्यातील गोरगरीब सामान्य जनतेच्या भल्यासाठी भरीव योगदान द्यावे. पत्रकारांना सध्या विविध आघाड्यांवर लढावे लागत असून त्यांच्यासमोर अनेक आव्हाने देखील आहेत. त्यांच्या विविध प्रश्नांवर सरकार नेहमीच सकारात्मक भूमिका घेईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यानिमित्ताने म्हटले आहे.