नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्र्यांचा एक गट आजपासून जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या दौर्‍यावर जात आहे. या गटात ३६ मंत्र्यांचा सहभाग असून येत्या २४ तारखेपर्यंत ते दोन्ही केंद्रशासित प्रदेशांमधल्या अनेक जिल्ह्यांना भेट देणार आहेत.

केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी या केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव बी. वी. आर सुब्रमण्यम् यांना या दौर्‍याबाबत माहिती दिली. केंद्रीय मंत्रीमंडळातल्या सर्व मंत्र्यांनी जम्मू कश्मीर आणि लडाखचा दौरा करावा, अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची इच्छा असल्याचं या पत्रात म्हटलं आहे.

जम्मू काश्मीर आणि लडाखच्या विकासासाठी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या अनेक विकासयोजनांची तसंच केंद्रानं घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती नागरिकांपर्यत पोचवण्यासाठी हा दौरा असल्याचं गृहमंत्रालयानं लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.