नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीबीएसई अर्थात केंद्रीय शिक्षण मंडळाच्या १० आणि १२ वीच्या उरलेल्या विषयांची परीक्षा १ ते १५ जून दरम्यान होणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वी १२ वीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचं काम प्रगतीपथावर असून येत्या ५० दिवसात ते पूर्ण होईल असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज सांगितलं.

शिक्षकांबरोबर एका वेबिनारमधे आज ते बोलत होते.उत्तरपत्रिका तपासून झाल्या की ताबडतोब मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करु असं ते म्हणाले. परिस्थिती सामान्य झाली की मगच शाळा उघडतील आणि शाळेत सोशल डिस्टन्सिंगचं  पालन करणं बंधनकारक राहील असं त्यानी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.

यासंदर्भात N C E R T चं कृतीदल विद्यापीठ अनुदान आयोगाच्या देखरेखीखाली दिशानिर्देश तयार करत आहे अशी माहिती त्यांनी दिली. नवीन शैक्षणिक धोरण वैज्ञानिक वृत्ती आणि संशोधनाचा पाया घालणारं असेल असं निशंक म्हणाले.  ९ वी आणि ११ वीच्या परीक्षांमध्ये यंदा अनुत्तीर्ण झालेल्यांना पुन्हा एकदा शाळेची परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी सीबीएसईनं दिली आहे.  ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना यापूर्वीच कुठल्याही परीक्षेशिवाय पुढच्या वर्गात पाठविण्यात आले आहे.