१९ जणांना गट क व ड संवर्गात सामावून घेतल्याची कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांची माहिती

मुंबई : आंबेनळी घाटात एक वर्षापूर्वी झालेल्या बस अपघातात मृत्यू झालेल्या डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी घेतला. 19 जणांना गट क आणि ड संवर्गात नियुक्तीचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला असून त्याची प्रत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सावंत यांना कृषिमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात झालेल्या बैठकीत देण्यात आली.

गेल्या वर्षी जुलैमध्ये कोकण कृषी विद्यापीठातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बसला आंबेनळी घाटात अपघात झाला होता. त्यात मृत्युमुखी पडलेल्या अपघातग्रस्त कुटुंबियांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत मागणी होती. त्यानुसार कृषी, वित्त, सामान्य प्रशासन विभागाने कार्यवाही करून गट क व ड मधील 19 कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर नियुक्तीचा शासन आदेश काढण्यात आला.

कृषी विद्यापीठांची बैठक मंत्रालयात कृषिमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी या आदेशाची प्रत कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरू यांना देण्यात आली.