नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातून बाहेर नेण्यात आलेल्या 231 पुरातन वस्तू गेल्या 9 वर्षांत भारतात परत आणण्यात आल्या असल्याची घोषणा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी काल केली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 70 वर्षांत तत्कालीन सरकारांना फक्त 13 अशा वस्तू परत आणता आल्या, याबद्दल त्यांनी टीकाही केली. देशभरात विज्ञान संग्रहालयं उभारून भारताच्या वारशाचं जतन करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले.

आकांक्षित जिल्ह्यांमध्ये अशी संग्रहालयं उभी राहिली आहेत आणि भारताच्या यशस्वी कोरोना लसीकरण मोहिमेसारख्या महत्त्वाच्या घटना आणि भारतातलं पारंपरिक ज्ञान अधोरेखित करत आहेत, असंही ते म्हणाले. नवी दिल्ली इथं भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन 2023 ला भेट देऊन सिंह यांनी सांस्कृतिक देवाणघेवाण आणि भारताच्या जी-20 अध्यक्षतेत संग्रहालयांचं योगदान अधोरेखित केलं. विविध संग्रहालयांमधल्या महत्त्वाच्या वस्तू, तसंच या क्षेत्रातला तांत्रिक विकास या प्रदर्शनात दर्शवण्यात आला आहे.