पुणे : समाजातील मुलींचे जन्‍मप्रमाण मुलांच्‍या तुलनेत कमी असल्‍याने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, महिला सक्षमीकरणाच्‍या योजनांना व्‍यापक प्रसिध्‍दी द्यावी, अशा सूचना निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिल्‍या.

जिल्‍हाधिकारी कार्यालयात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेंतर्गत जिल्‍हा स्‍तरीय कृती समितीची बैठक झाली. यावेळी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी दत्‍तात्रय मुंडे, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी भगवान पवार, बाल विकास प्रकल्‍प अधिकारी हिवराळे, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, जिल्‍हा विधी सल्‍लागार मेधा सोनतळे,  मीरा टेकवडे यांच्‍या सह इतर अधिकारी उपस्थित होते.

निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. कटारे म्‍हणाल्‍या, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’  ही मोहीम काळाची गरज झाली आहे. समाजामध्‍ये मुला-मुलींना समान दर्जा असावयास हवा, तथापि, काही कारणांमुळे नकळतपणे असा भेदभाव होतो.  मुलींच्‍या शिक्षणाचे प्रमाण वाढावे, त्‍यांच्‍यात जागृती व्‍हावी यासाठीही प्रभावीपणे काम व्‍हायला हवे, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

मार्चमध्‍ये जागतिक महिला दिनानिमित्‍त कार्यक्रम घेवून त्‍यामध्‍ये गुणवंत तसेच प्रेरणादायी काम करणा-या मुलींचा सत्‍कार करण्‍यात यावा, अशी सूचना त्‍यांनी केली. बैठकीत मुलींच्‍या सर्वांगीण विकासाबाबत तसेच मुलांमध्‍येही सामाजिक जबाबदारी निर्माण होण्‍यासाठी विविध उपक्रम राबविण्‍या बाबत व्‍यापक चर्चा झाली.