नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक दर्जाची बँकिंग सेवा देण्यासाठी आवश्यक कुशल, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग बँकिंग संस्थांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेनं घ्यायला हवी असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितलं.

संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमीत्त पुणे इथं झालेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. ठेवींवरचं विमा संरक्षण ५ लाख रुपयांपर्यंत वाढवल्यानं गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण होईल असंही ते म्हणाले.

भारतीय रिझर्व्ह बँकेनं केलेल्या उपाययोजनांमुळे यामुळे आर्थिक गैरप्रकारांना आळा बसेल, आर्थिक प्रणाली अधिक विश्वासार्ह होईल आणि यातून देशातल्या बँकीग व्यवस्थेत स्थिरता येईल असा विश्वासही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला आहे.

बँकांनी राष्ट्र उभारणीच्या कामात दिलेलं योगदान मोलाचं असून, त्या बँका देशाच्या अर्थविषयक व्यवस्थेचा कणा असल्याचं कोविंद यांनी यावेळी अधोरेखित केलं.