मुंबई : मुंबई शहरातून वाहणाऱ्या पोईसर आणि दहिसर नद्यांचे प्रदुषण कमी करण्यासाठी जलदगतीने आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या.

मंत्रालयात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी नगरसेविका शितल म्हात्रे, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, रिव्हर मार्च मुव्हमेंटचे प्रतिनिधी गोपाल जव्हेरी, तेजस शाह, पंकज त्रिवेदी, राजेश जैन आदी उपस्थित होते.

पोईसर व दहिसर नदी सुशोभीकरण व पुनर्जीवित करणे त्यासोबत उपनगरातील डिपी रोड आणि मिसींग लिंक रोडसंदर्भात यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली. बैठकीत नदी परिसरातील 20 तबेल्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली. पोईसर आणि दहिसर नद्यांचे प्रदुषण कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रश्न तातडीने सुटणे आवश्यक असून यावर जलद कार्यवाही व्हावी, असे निर्देश मंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी दिले.

यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये इलेक्ट्रिक कार सुरु करणे, पार्कींग सुरु करणे आदी विषयांवर चर्चा झाली. याबाबत संबंधित विभागाची तातडीने बैठक घेऊन प्रश्न सोडविला जाईल, असे मंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले.