पुणे : अतिवृष्टीने बाधित झालेल्या नागरिकांसाठी व चारा टंचाईसाठी लागणारा अत्यावश्यक निधी तातडीने दिला जाईल, अशी ग्वाही बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात बहुजन कल्याण विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागाची आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी, कोल्हापूर जिल्हयाचे जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई, पुण्याचे अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, सोलापूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी संजय जाधव, सातारा जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पुण्याचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे आदी  उपस्थित होते.

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुणे महसूल विभागातील पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा या पाचही जिल्ह्यांचा आढावा घेतला. ते म्हणाले, या सर्व जिल्ह्यातील पुनर्वसनाची तातडीची कामे लक्षात घेवून  त्यांचा अहवाल तातडीने शासनाकडे सादर करावा. त्याचबरोबर यापुढे जिल्ह्यातील मदत व पुनर्वसनाच्या कामांबाबतचा मासिक अहवालही पाठविणँयाच्या सूचना त्यांनी दिल्या. उपलब्ध करण्यात येत असलेल्या तातडीच्या मदतीमध्ये अत्यावश्यक असलेल्या निधी बाबत अहवाल देवून उर्वरित आवश्यक निधी तातडीने संबंधितांना देण्यात येईल. या पाचही जिल्ह्यांतील कमी पडत असलेल्या निधीचा आढावा घेवून तो तातडीने उपलब्ध करुन दिला जाईल,  असेही त्यांनी यावेळी सांगितले.  बहुजन कल्याण विभागाच्या विविध कामांचा आढावाही त्यांनी घेतला. या बैठकीस मदत व पुनर्वसन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.