मुंबई : पर्यावरणपूरक होळी साजरी करून राज्यातील जनतेने धुळवडीचा आनंद साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यांनी राज्यातील जनतेला होलिकोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

हा विविध रंगांचा उत्सव आहे. यानिमित्ताने परस्परांतील मैत्री, स्नेह वाढीस लागावा आणि सर्वांच्या जीवनात इंद्रधनुष्यी रंगांची उधळण व्हावी. या आनंददायी उत्सवावर यावर्षी ‘कोरोना’चे सावट आहे. अद्यापपर्यंत राज्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही मात्र सर्वांनी सजग राहून आणि स्वच्छतेची योग्य ती काळजी घेऊन हा उत्सव साजरा करावा. सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळावी तसेच योग्य ती खबरदारी घेऊन आनंद द्विगुणित करावा असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.