नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ११ झाली असून या सर्व रुग्णांमध्ये लक्षणं कमी प्रमाणात जाणवत असल्यामुळे काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं महत्वाचं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

कोरोनाबाबतचा राज्यव्यापी आढावा घेण्यासाठी, मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांशी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या ७ देशांमधून आलेल्यांचं शंभर टक्के विलगीकरण करण्यात यावं, यात्रा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावेत, जे परदेशातून प्रवास करुन आले आहेत त्यांनी १४ दिवसांपर्यंत घरीच थांबावं, आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेल्या शहरांमध्ये विलगीकरणाची सुविधा तातडीनं निर्माण करावी, आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात मास्क उपलब्ध व्हावेत याचा, जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा, प्रत्येक शहरातल्या पर्यटन व्यावसायिकांनी परदेश प्रवास केलेल्या आणि सध्या परदेशात असलेल्या प्रवाशांची यादी प्रशासनाला द्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केल्या.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, मुख्य सचिव अजोय मेहता यावेळी उपस्थित होते.