नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तमीळनाडूमध्ये येत्या १५ जून पासून घरांची यादी आणि गणना करण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती तमिळनाडूचे महसूल मंत्री आर.बी. उदयकुमार यांनी दिली आहे. ते काल चेन्नईत बातमीदारांशी यांचे बोलत होते. राज्यात जनगणनेची प्रक्रिया ४५ दिवस चालेल आणि त्यासाठीची अधिसूचना लवकरच जारी केली जाईल असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी प्रक्रियेत नव्याने समाविष्ट केलेल्या प्रश्नांच्या ३ अतिरिक्त संचाबद्दल राज्यात संभ्रमाचे वातावरण आहे. याबाबत केंद्र सरकारने लवकरात लवकर स्पष्टीकरण द्यावे, असे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे कळवले आहे. आता जोपर्यंत केंद्र सरकारकडून प्रतिसाद मिळत नाही, तोपर्यंत राज्यात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी प्रक्रिया राबवली जाणार नाही, असेही उदयकुमार यांनी स्पष्ट केले.