नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात काल कोरोना विषाणुचा संसर्ग झालेले आणखी चार नवे रुग्ण आढळले. यामुळे महाराष्ट्रातल्या कोरोना बाधितांची संख्या ४५ वर पोहोचली आहे.

देशात सर्वाधिक रुग्णांची संख्या महाराष्ट्रात झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये नेदरलँडहून दुबई मार्गे पुण्यात आलेली एक महिला, फिलिपिन्स, सिंगापूर, आणि श्रीलंकेचा प्रवास करून आलेला पिंपरी-चिंचवडमधला एक तरुण, अमेरिकेत प्रवास करून आलेली मुंबईतली एक महिला, तसंच दुबईत प्रवास करून आलेल्या रत्नागिरीतल्या एका पुरुषाचा समावेश आहे.

राज्यात सध्या पिंपरी चिंचवड मध्ये ११, मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी ८, नागपूरमध्ये ४, यवतमाळ – नवी मुंबई आणि कल्याणमध्ये प्रत्येकी ३ तर ठाणे- रायगड-रत्नागिरी-अहमदनगर आणि औरंगाबाद मध्ये प्रत्येकी १ असे एकूण ४५ कोरोनाबाधित रुग्ण आहेत.