नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊन कालावधीत भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तुंची थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांचे गट स्थापन करत असल्याचं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यानं आज सांगितलं.

शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर भाजीपाला फळफळावळ उपलब्ध आहे. मात्र लॉकडाऊनमुळे तो ग्राहकांपर्यंत पोचवण्यात अडचण येत आहे. यावर उपाय म्हणून आम्ही उत्पादक आणि ग्राहकांची थेट विक्री यंत्रणा निर्माण करत आहोत. यासाठी तीन आणि पाच किलोग्रॅम वजनाची भाजीपाल्याची पाकिटं तयार करत असून ही पाकिटं संबंधित गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोचवली जाणार असल्याचं या अधिकाऱ्यांनं सांगितलं.

जिल्हा पातळीवर कृषी अधिक्षक अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ही योजना राबवली जाणार आहे.