नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जैन धर्माचे २४वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज सर्वत्र साजरी होत आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान महावीरांचा सत्य आणि अहिंसेचा संदेश आजही सुसंगत असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या ट्वीटमधे म्हटलं आहे.

उपराष्ट्रपतींनी म्हटलंय की, महावीरांच्या बंधुभाव आणि मानवतेच्या शिकवणीचं अनुसरण करुन आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करुया. प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे की भगवान महावीरांचं जीवनचरित्र सर्वांसाठी कायम प्रेरणादायक राहील.

महावीर जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

महावीर जयंतीनिमित्त आज मुंबईतले दोन्ही शेअर बाजार आणि चलनबाजार बंद आहेत.