नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनतेसाठी जीवनावश्यक वस्तू वाजवी दरात आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्यांना दिले आहेत. साठेबाजी, काळा बाजार, नफेखोरी यासारख्या गुन्ह्यांबाबत कडक कारवाई करावी, असं केंद्रीय गृह सचीव अजय भल्ला यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

अन्नपदार्थ, औषधं, वैद्यकीय उपकरणं यांचा योग्य पुरवठा व्हावा यादृष्टीनं जीवनावश्यक वस्तू कायद्यातल्या तरतुदींचा अवलंब करावा, असंही त्यात म्हटलंय. साठा मर्यादा निश्चित करणं, दर नियंत्रण, उत्पादन वाढवणं, व्यापाऱ्यांची हिशेबतपासणी आणि इतर उपाययोजनाही राज्यांनी राबवाव्यात यावर या पत्रात भर दिला आहे.