मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शांताराम कुंजीर यांना श्रद्धांजली

मुंबई : समाजाच्या प्रश्नांसाठी संघर्षशील पण सनदशीर मार्गाने प्रयत्न करता येतात. त्यासाठी संघर्षाला अभ्यासाची जोड द्यावी अशी जाणीव निर्माण करणारा लढवय्या आणि संवेदनशील कार्यकर्ता शांताराम बापू कुंजीर यांच्या निधनामुळे हरपल्याची शोक भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

शोक संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, मराठा समाजाच्या संघर्षशील चळवळीला अभ्यासाची जोड देण्यासाठी शांताराम कुंजीर यांनी प्रयत्न केले. त्यामुळेच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सनदशीर आणि शांततापूर्ण चळवळ उभी केली. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी अभ्यासपूर्ण अशी मांडणी केली. पण त्यासाठी संघर्षाची तयारी ठेवली.

सामाजिक लढा देताना समाजातील अन्य घटकांप्रतीही संवेदनशीलता बाळगण्याची काळजी घेतली. त्यामुळेच त्यांच्या आंदोलनाला सर्वसमावेशक आणि व्यापक असा पाठिंबा मिळाला. त्यांच्या निधनामुळे सामाजिक चळवळतील अभ्यासू, लढवय्या कार्यकर्ता हरपला आहे.