नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत २० राज्यांमधून निवडून आलेल्या ६१ उमेदवारांचं उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी स्वागत केलं आहे. सुमारे २० राजकीय पक्षांचं प्रतिनिधीत्व करणारे हे ६१ सदस्य आपल्या राजकारणातलं वैविध्य अधोरेखित करतात, असं त्यांनी म्हटलं आहे.

या निवडणुकीनंतर २४५ सदस्यांच्या राज्यसभेत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं संख्याबळ वाढलं आहे. ६१ पैकी ४३ सदस्य नवे असून, त्यात भाजपाचे ज्योतिरादित्य शिंदे आणि काँग्रेसचे मल्लिकार्जून खर्गे यांचा समावेश आहे.

हे दोघेही याआधी लोकसभेचे सदस्य होते, मात्र २०१९ च्या निवडणुकीत ते पराभूत झाले. माजी प्रधानमंत्री एच.डी.देवेगौडा आणि लोकसभेचे माजी उपसभापती एम तंबीदुराई यांचीही राज्यसभेवर निवड झाली आहे.