नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर हत्याकांड प्रकरणी सीआयडी, अर्थात गुन्हे अन्वेषण विभागानं १२६ आरोपींविरुद्ध दोन आरोपपत्रं दाखल केलं आहे. तीन महिन्यांपूर्वी जमावानं केलेल्या मारहाणीत दोन साधू आणि त्यांच्या वाहन चालकाचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणी सीआयडीनं ४ हजार ९५५ पानांचं एक, तर ५ हजार ९२१ पानांचं एक, अशी दोन आरोपपत्रं डहाणूच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात काल दाखल केली.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकानं ८०८ संशयित आणि ११८ साक्षिदारांची तपासणी केली. एकूण १५४ जणांना अटक केली असून ११ बाल गुन्हेगारांना ताब्यात घेतलं. आतापर्यंत एकाही आरोपीची जामिनावर सुटका झालेली नाही, असं सीआयडीच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.