नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किराणा दुकानांमध्ये काम करणारे कामगार, भाजी आणि इतर विक्रेत्यांची कोरोना चाचणी घेण्याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे.

किराणा दुकानांमध्ये काम करणाऱ्यांची तपासणी न केल्यास त्यांच्यामार्फत संसर्ग पसरण्याची शक्यता असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. याबाबत आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवलं आहे.

ऑक्सिजनची सुविधा असलेल्या रुग्णवाहिकांचा वापर करण्यावर भर देतानाच राज्यांनी रुग्णवाहिकांकडून सेवा नाकारली जाण्याच्या प्रकारांवरही नियंत्रण ठेवावं, अशी सूचना भूषण यांनी केली आहे. दरम्यान, कोरोनामूळं मृत्यू होण्याचं प्रमाण अधिक असलेल्या जिल्हा आणि राज्यांमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी भूषण यांनी काल उच्च स्तरीय बैठक घेतली.