मुंबई : आरटीईअंतर्गत प्रवेश देताना अनाथ मुलांची अनाथालयाची कागदपत्रेच ग्राह्य धरण्यात यावीत असे सुस्पष्ट निर्देश शालेय शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले आहेत.

अनाथ मुलांच्या शाळा प्रवेशात कागदपत्रांच्या अनेक अडचणी निर्माण होत होत्या. विशेषतः त्यांचे उत्पन्नाचे दाखले मागितले जात असत तसेच त्यांच्या नावासमोर जात व शेवटचे नाव काय लिहावे याबाबत संभ्रम होता. त्यामधे सुस्पष्टता आणण्यासाठी महत्त्वाचा शासन निर्णय जरी करुन शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी या मुलांना मोठा दिलासा दिला आहे.

याबाबत निर्णय खालीलप्रमाणे –

  • आरटीई 25% प्रवेशाकरिता बाल सुधारगृह/अनाथालये मधील विद्यार्थी या संवर्गाचा समावेश करण्यात यावा तशी सुविधा एन आय सी पुणे यांनी पोर्टलमध्ये उपलब्ध करावी.
  • अन्यथा बालकांच्या प्रवेशाकरिता अनाथालयाची किंवा बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत
  • अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेण्यात येऊ नये.
  • सरल डेटाबेसमध्ये अनाथ विद्यार्थ्यांकरिता खालील सुविधा एनआयसी पुणे यांनी उपलब्ध कराव्यात-

१.      विद्यार्थ्यांचा पिता/आई यांचे नाव माहित नसल्याकारणाने मधले नाव या ठिकाणी Not known सुविधा उपलब्ध करावी.

२.     शेवटचे नाव या ठिकाणीसुद्धा Not known सुविधा उपलब्ध असावी

३.     धर्म माहिती नसल्याने Other सोबत Not known सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी

४.     Category यामध्ये अनाथ असे नोंदवण्याची सुविधा उपलब्ध असावी

५.    अनाथ मुले शाळेत प्रवेशानंतर दत्तक गेल्यास दत्तक घेणाऱ्या पालकाचे नाव आडनाव अद्ययावत करण्यासंदर्भात माहिती New entry tab द्वारे उपलब्ध करून देण्यात यावी.