मुंबई : प्रथम वर्ष पदवी व्यावसायिक, तांत्रिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. याचा फायदा कोल्हापूर, सांगली,सातारा, कोकण सह राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यू. यू. ललित आणि न्यायमूर्ती विनित सरन यांच्या खंडपीठासमोर आज यासंदर्भात सुनावणी झाली. सुनावणी नंतर २०१९-२०२० च्या शैक्षणिक वर्षाकरिता पदवी व्यावसायिक, तांत्रिक अभ्यासक्रमाची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा या प्रक्रियेमध्ये प्रवेश घेता येतील. सीईटी विभागाला तशा स्वरुपाचे निर्देश देण्यात आले असून,सदर सूचना सीईटी सेल च्या वेबसाईटवर प्रकाशित करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहे. या राज्यातील पूरग्रस्त स्थितीनंतर प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ होण्याची विनंती करणारी याचिका प्रवेश नियामक प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यापूर्वी १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत मुदत ठेवण्यात आली होती. परंतु आता ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत प्रवेश प्रकियेची मुदत वाढविल्यामुळे याचा फायदा हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे.