नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्टँड अप इंडिया या योजनेच्या अंतर्गत ५ वर्षात १,१४,३२२ घटकांना २५,५८६ कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. उद्या या योजनेला पाच वर्ष पूर्ण होत आहेत. तळागाळातील नवउद्योजकांना, अनुसूचित जाती आणि जमातीमधील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं आणि रोजगार निर्मिती करणं हा योजनेचा उद्देश आहे. या योजनेला २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. देशभरातील साखर कारखान्यांनी मार्च अखेरपर्यंत २७७ लाख टन साखरेचं उत्पादन केलं असून त्यात महाराष्ट्राचा वाटा १०० लाख टनांचा आहे . त्याखालोखाल उत्तर प्रदेशात ९४ लाख टन साखरेचं उत्पादन झालं आहे.

यंदा गेल्यावर्षीपेक्षा ५३ कारखाने जास्त सुरु झाले असल्यानं त्याचबरोबर उसाचं क्षेत्रही वाढल्यानं साखरेच्या उत्पादनात वाढ होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. राज्यातील ११३ कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे तर ७६ कारखाने अजूनही सुरु आहेत. देशभरातील सुमारे २०० कारखाने अद्याप सुरु असल्यानं यंदा साखरेच्या उत्पादनात ११० ते ११५ लाख टनापर्यंत वाढ होईल असा अंदाज आहे . मात्र कोरोना प्रादुर्भावामुळं या साखरेला मिळणाऱ्या बाजारपेठेची चिंता कारखान्यांना भेडसावत आहे . दुसऱ्या बाजूला इथेनॉलच्या  उत्पादनातही यंदा भरीव वाढ झाली आहे .