मुंबई (वृत्तसंस्था) : ठाण्यात वर्तक नगर इथल्या वेदांत रुग्णालयात ऑक्सिजन अभावी 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला असून सहा सदस्यीय समितीद्वारे चौकशी करण्याची घोषणा शासनानं केली आहे.

आज सकाळी अशा प्रकारचं वृत्त येताच रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टर जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली. त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. मात्र रुग्णालय प्रशासनाने असा प्रकार झाला नसल्याचा दावा केला आहे. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने, अनुचित प्रकार घडू नये म्हणून रुग्णालय आणि परिसरात पोलीस दाखल झाले होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. या घटनेची चौकशी करण्याकरता समिती स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली.