मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती औषधं, वैद्यकीय उपकरणं यांची उपलब्धता राहील, तसंच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहील हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिल्या. यासंदर्भात टास्क फोर्समधील डॉक्टर्स, वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेतच्या बैठकीत ते बोलत होते.

दुसरी लाट ओसरत असून त्यातील अनुभवातून आपल्याला आवश्यक ती औषधी, आरोग्य सुविधा, खाटा, ऑक्सिजन उपलब्धता या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करावं लागेल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

तिसऱ्या लाटेत सक्रीय रुग्णांची संख्या ८ लाख होऊ शकते, तसंच १० टक्यांच्या आसपास संसर्गग्रस्त मुलांची संख्या असू शकते, असे आरोग्य विभागानं सादरीकरणात सांगितलं. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, यांची उपस्थिती होती.