नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातल्या 23 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे, मात्र प्रयागराज, वाराणसी, भदोही, गाझियापूर आणि बलिया या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल पूरग्रस्त वाराणसीला भेट दिली. प्रशासनाने उभारलेल्या छावण्यांचीही त्यांनी पहाणी दिली. गंगा आणि वरुणा नद्यांमधली पाण्याची पातळी वाढल्यामुळे इथे पूर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतल्या परिस्थितीचा आढावा 2 दिवसांपूर्वी घेतला होता. बिहारमध्ये पूरस्थिती बिकट होत असून पाटणा, बक्सर, मुंगेर, भोजपूर आणि भागलपूर सह बारा जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. पूरग्रस्त भागांमध्ये तातडीनं बचाव आणि मदत कार्य सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यातल्या सहाशे गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.