नवी दिल्ली : भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी हा भारताच्या परदेश धोरणाचा महत्वाचा स्तंभ असल्याचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. फ्रान्सच्या खासदारांच्या प्रतिनिधीमंडळाने नवी दिल्लीत उपराष्ट्रपतींची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. जगात शांतता आणि सलोखा नांदावा यासाठी भारत आणि फ्रान्सने परस्परांशी घनिष्ठ सहकार्य ठेवावे असे आवाहनही त्यांनी केले.

शेजारी राष्ट्रांसह सर्वच राष्ट्रांच्या शांततापूर्ण सह अस्तित्वावर भारताचा कायम विश्वास राहिला आहे. आम्ही कोणत्याही देशाच्या अंतर्गतबाबीत हस्तक्षेप करत नाही आणि आमच्या देशाच्या अंतर्गत बाबीतही कोणी दखल देता कामा नये असे त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

फ्रान्सबरोबर संरक्षण सहकार्य, सागरी सुरक्षा, अंतराळ सहकार्य, आर्थिक भागीदारी, दहशतवादाला आळा या क्षेत्रातली भागीदारी भारतासाठी मोलाची आहे.

उभय देशातले सहकार्य अधिक घनिष्ठ करण्यासाठी इंडो-फ्रेंच संसदीय मित्र गट स्थापन करावा असे उपराष्ट्रपतींनी सुचवले.