नाशिक : निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल ही  वर्तमानाची गरज आहे तसाच विचार पर्यावरण आणि विकासाच्या बाबतीत सर्वांना करावा लागणार आहे, विकास व पर्यावरण हे जणू एकमेकांचे परस्पर विरोधी शब्द आहेत असे वातावरण अलिकडे सर्वत्र निर्माण झाले असताना ‘मित्रा’ विकास आणि पर्यावरण यांच्यातील सांधा म्हणून काम करेल. तसेच पर्यावरणाचा सन्मान राखूनच शाश्वत विकास शक्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

नाशिक येथील महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण व संशोधन संस्था ‘मित्रा’ च्या नूतन इमारतीच्या व मुख्य अभियंता कार्यालयाच्या इमारतीच्या ई-उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अभासी पद्धतीने तर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य प्रधान सचिव सुजाता सौनिक, आमदार नरेंद्र दराडे, सरोज अहिरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, मित्रा चे संचालक प्रशांत भामरे, उपसंचालक महुवा बॅनर्जी आदी  उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, दिवसेंदिवस निसर्गाची बदलणारी रूपं त्यातून एकापाठोपाठ येणारी तौक्ते, निसर्ग व गुलाब यासारख्या चक्रीवादळांनी मानवी जीवनाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडले आहे. त्याची प्रचिती आपल्या सगळ्यांना कालच मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात आली आहे. या सर्वांची कारणमिमांसा करण्याची आपल्याला गरज आहे. विकासाच्या हव्यासापोटी आपण काही चुकीचे तर करत नाही ना? याचेही चिंतन व्हायला हवे. प्रत्येकाला आपल्या उद्योग व्यवसायाबरोबरच विद्यार्थी म्हणूनही जगावे लागणार आहे, त्यासाठी चांगल्या प्रशिक्षण संस्थांची गरज असते त्यात संपूर्ण देशात ‘मित्रा’च्या रूपाने एक पाऊल पुढे महाराष्ट्र आहे. ही प्रशिक्षण संस्था केवळ राज्य, देशात नाही तर संपूर्ण जगाच्या पर्यावरण अभियांत्रिकी संशोधनात खऱ्या अर्थाने ‘मित्रा’ सारखे काम करेल असा विश्वास वाटतो, असेही यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

पाण्याचे चांगले प्लांट उभारणे हे जसे गरजेचे आहे त्याचप्रमाणे त्या प्लांटच्या  माध्यमातून गुणवत्तापूर्ण पाणी घराघरात नळाद्वारे पोहचवण्याचे व्यवस्थापन कौशल्य ही आजची नितांत गरज आहे. अतिवृष्टीमुळे पाणी दारातून घरात जातेय तेच पाणी दारातून न जाता ते नळातून घराघरात कसे पोहोचेल याचे व्यवस्थापन भविष्यात ‘मित्रा’ माध्यमातून होईल असा विश्वास व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संस्थेचे ठिकाण, वातावरण, सोयीसुविधा यांचे कौतुक करून त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करून नाशिकला आल्यावर ‘मित्रा’ ला आवर्जुन भेट देण्याचे आश्वासन यावेळी दिले.

नाशिकलाही करणार कृषी भवन : उपमुख्यमंत्री अजित पवार

संस्था निर्माण करण्याबरोबरच त्या दर्जेदारपणे चालल्याही पाहिजेत, त्या दीर्घकाळ उपयोगात आल्या पाहिजेत यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून त्या प्रयत्नांची फलनिष्पत्ती म्हणजे ‘मित्रा’ आहे. आज या संस्थेच्या इमारतीचे उद्घाटन करतानाच राज्याची तहान भागविणारे म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून येथील औद्योगिकीकरणाचा व नागरीकरणाचा वेग यांच्याशी शिक्षण, रोजगार आणि लोकसंख्या सांघड घालून शहरांच्या विकासाचे नियोजन सुरू आहे. या नियोजनात स्वच्छ पाण्याबरोबर त्याची गुणवत्ता राखण्याचीही काळजी घेतली जाणे अपेक्षित आहे, ही गुणवत्ता ‘मित्रा’ च्या माध्यमातून जपण्याचे काम निरंतर सुरू आहे, भविष्यातही ते सुरू राहील. राज्यात केंद्रासोबत १४ हजार कोटींच्या पाणी योजनांची उभारणी सुरू असून या योजनांच्या निर्मितीसोबतच जलसाक्षरता व जनजागृतीची गरज असल्याचे सांगून पुण्यात २२२ कोटी रूपये खर्च करून कृषी भवन निर्माण केले जात आहे, त्यापाठोपाठ ते नाशिकमध्येही उभारले जाईल असे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मागणीला अनुसरून यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही ‘मित्रा’होईल यशस्वी : छगन भुजबळ

पर्यावरणाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याच धर्तीवर नाशिकमध्ये मित्रा ही संस्था निर्माण करण्यात आलेली असून देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ही संस्था यशस्वी होईल असा विश्वास पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. यावेळी श्री.भुजबळ म्हणाले की, अतिशय चांगले वातावरण असलेल्या नाशिक येथे मित्रा संस्थेची निर्मिती करण्यात आलेली आहे. ही संस्था अतिशय उपयोगी ठरणार आहे. मित्रा येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्ती नाशिक जिल्ह्यात असंख्य ठिकाणाचा अभ्यास तसेच पर्यटन करता येणे शक्य होणार आहे. पर्यावरणाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचे संशोधन या ठिकाणी होईल शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, नागरिकांना स्वच्छ पाणी मिळणे तसेच शहर स्वच्छ राहणे अतिशय आवश्यक असते. ती आपल्या माध्यमातून होत आहे. ही अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे.

राज्यात अतिशय यशस्वीपणे येवल्यातील अडतीस गाव पाणी योजना सुरू असून देशभरात या पाणी पुरवठा योजनेचा गौरव करण्यात आलेला आहे. येथील नागरिकांच्या हातात संस्थेचे नियोजन सुरू असल्याने यशस्वीपणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कृषी क्षेत्रात नाशिक जिल्हा हा अग्रेसर आहे. त्यामुळे मित्राच्या धर्तीवर कृषी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात कृषी भवन निर्माण करण्यात यावे, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल : दादाजी भुसे

मित्रा च्या माध्यमातून देशाच्या व जगाच्या पातळीवर जे नवनवीन तंत्रज्ञान वितसित होत आहे त्याचे त्याचे प्रशिक्षण, व्यवस्थापनासोबतच देखभाल, दुरूस्तीचेही प्रशिक्षण देणारा हा भव्य प्रकल्प शेतकऱ्यांसाठी योगदान ठरणार असल्याचे प्रतिपादन यावेळी कृषिमंत्र्यांच्या दादाजी भुसे यांनी यावेळी व्यक्त केले.

मुख्य संसाधन केंद्र ठरणार : गुलाबराव पाटील

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, देशात राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन अंतर्गत मीत्रा संस्था मुख्य संसाधन केंद्र ठरणार आहे. 2024 पर्यंत हर घर जल हे उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी तसेच पाणी पुरवठ्याच्या योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. त्याकरीता या प्रशिक्षण संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यशदा प्रशिक्षण संस्थेने प्रमाणेच अनेक आधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण अशी मीत्रा प्रशिक्षण संस्था देशपातळीवर नाव लौकिक मिळवेल, असा विश्वास मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.