मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना हा पक्ष जनतेच्या मतांशी बेइमानी करून सत्तेवर आल्याचा आरोप विधाननसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणावर प्रतिक्रिया देताना ते आज नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कालच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी संघराज्य व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना भाजप कधीच बदलू देणार नाही. डाव्या विचाराच्या पक्षांसोबत राहून घटना  बदलण्याचे शिवसेनेचे मनसुबे आपण यशस्वी होऊ देणार नाही असं फडणवीस यांनी सांगितलं. ज्या बंगालमध्ये एकही उद्योग टिकू शकला नाही अशा बंगालप्रमाणे मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र करायचा आहे ? असा प्रश्न उपस्थित करत भाजपा आहे तो पर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही असं त्यांनी सांगितलं.