भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी व्यक्‍त केली शक्‍यता

मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप युतीची घोषणा 19 सप्टेंबरला होण्याची शक्‍यता असल्याचे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. 19 सप्टेंबरला नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेचा समारोप होणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत. यावेळी युतीची घोषणा होण्याची शक्‍यता असल्याचे लाड यांच्यांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान शिवसेनेने 288 मतदारसंघांसाठी चाचपणी सुरू केली आहे. मातोश्रीवर शिवसेनेची महत्त्वाची बैठक सुरू आहे. युतीच्या 50-50 टक्के फॉर्म्युलाबाबत प्रश्नचिन्हे उपस्थित झाले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या जागांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तयार करणार आहेत. नंतर ही यादी घेऊन मी पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी यांना दाखवून जागांचे ठरवू, असे सांगत युतीच्या जागा वाटप तिढ्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला होता. दरम्यान, शिवसेना 135-135 च्या फॉर्म्युलावर ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. तर भाजप शिवसेनेला 110 ते 116 जागा देण्यास राजी आहे. त्यामुळे युती होणार की नाही, याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, शिवसेना निम्या-निम्या जागावर अजूनही ठाम असल्याचे बोलले जात आहे.तर शिवसेनेने 288 जागांवर मुलाखती घेतल्याचे आपल्याला माहिती नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.