नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून जोहान्सबर्ग इथं सुरु झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारतानं पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली याला दुखापतीमुळे या सामन्याला मुकावं लागलं असून, त्याच्याऐवजी के.एल. राहुल याच्याकडे भारताच्या संघाचं नेतृत्व दिलं गेलं आहे. कोहलीच्या जागी हनुमा विहारी याचा संघात समावेश केला आहे. याव्यतिरिक्त पहिल्या सामन्यातला विजयी संघच भारतानं, या सामन्यातही कायम ठेवला आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना जिंकून भारतानं १-० अशी आघाडी घेतली आहे.