नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांचं पूर्ण लसीकरण झालं असेल तर यापुढे त्यांना प्रवासापूर्वीची RT-PCR चाचणी करणं बंधनकारक राहणार नसल्याचं आरोग्य मंत्रालयानं आज जारी केलेल्या नव्या नियमावलीत म्हटलं आहे. हा नियम केवळ ज्या देशांमध्ये भारतीय लस प्रमाणपत्र ग्राह्य धरलं  जातं, अशा देशातून येणाऱ्या प्रवाशांकरताच लागू राहणार आहे. सध्या अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, मेक्सिको, मध्य पूर्वेतले देश, न्यूझीलंड, मलेशिया यासारख्या ८२ देशांचा यामध्ये समावेश आहे. या नियमावलीनुसार ‘जोखीम गटातले देश’ ही श्रेणी आता रद्द करण्यात आली आहे. पूर्वीच्या ७ दिवसांच्या गृहविलगीकरणाऐवजी आता केवळ १४ दिवस प्रवाशांना स्वतःच्या तब्येतीवर लक्ष द्यावं लागेल. तसंच आगमनानंतर ८ व्या दिवशी RT-PCR चाचणी करून त्याचा अहवाल Air Suvidha portal अपलोड करणं देखील बंधनकारक नसेल. हा नियम सोमवारपासून लागू होणार आहे.