मुंबई (वृत्तसंस्था) : सध्या घडत असलेले सायबर आणि आर्थिक गुन्हे, समाज माध्यमं आणि ऑनलाइनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी, तसंच पोलिसांचं कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. या संदर्भात मंत्रलयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

सायबर गुन्ह्यांना अटकाव करण्यासाठी राज्यात सायबर पोलीस स्थानकाची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून प्रभावीपणे सायबर कायद्याची अंमलबजावणी करण्याबरोबरच दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

धार्मिक भावना भडकावणारे, सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे प्रकार घडले, तर त्यांना तत्काळ अटकाव करावा लागतो यासाठी सायबर स्पेसवरुन संबंधित मजकूर हटवणं आवश्यक असतं. त्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. या बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.