मुंबई (वृत्तसंस्था) : निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांसाठी बीडीडी चाळीतल्या घरांची किंमत ५० लाख रुपयांवरुन २५ लाख रुपये करण्याचा निर्णय आज राज्य सरकारनं जाहीर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सल्ल्यावरुन २५ लाखात बीडीडी चाळीतल्या निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घर नावावर करून देण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

त्यामुळं आता घर रिकामी करुन प्रकल्प पुढे जाऊ देण्याचं आवाहन त्यांनी रहिवाशांना केलं. वरळी, नायगाव आणि एन. एम. जोशी मार्गावरच्या बीडीडी चाळीत राहणाऱ्या नागरिकांचा प्रश्न २५ वर्षांनी मार्गी लागल्याची प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.