नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला प्रगतीच्या मार्गावरुन पुढं न्यायचं असेल तर मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियमवर आयोजित पहिल्या वीर बाल दिवस समारंभात ते बोलत होते. गुरु गोविंद सिंग यांच्या ४ पुत्रांच्या बलिदानाचा दिवस यंदापासून वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत गुरु गोविंद सिंग आणि त्यांच्या पुत्रांनी बलिदान दिलं, असं ते म्हणाले. आजचा युवकही देशकार्यासाठी याच समर्पण वृत्तीनं तयार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावेळी उपस्थितांना संबोधित केलं. महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातले जुने नातेसंबंध यावेळी त्यांनी उलगडून दाखवले. राज्याच्या विकासात शिख बांधवांनी बजावलेली भूमिका आणि दंगलीच्या वेळी त्यांच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी उपस्थितांना ओळख करुन दिली.