नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स देशांच्या उद्योगपतींना भारतातल्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं आहे. भारत हा गुंतवणूकीसाठी सर्वाधिक खुला आणि मैत्रीपूर्ण देश आहे असंही ते म्हणाले. ते ब्रासिलिया इथल्या ब्रिक्स परिषदेच्या समारोप प्रसंगी बोलत होते.

भारत राजकीय स्थिरता, सकारात्मक धोरण आणि व्यवसायसुलभ अर्थव्यवस्थेमुळे गुंतवणूकीसाठी योग्य देश आहे, असंही ते म्हणाले. जगभरात मंदीची स्थिती असतांनाही ब्रिक्स देशांनी म्हणजेच ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण अफ्रिकेनं आर्थिक प्रगती साधली आहे असंही ते म्हणाले.

या देशांनी अर्थव्यवस्थेला वेग आणला त्याचप्रमाणे करोडो लोकांना दारिद्र्य रेषेतून बाहेर आणले, त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाच्या आणि संशोधनांच्या माध्यमातून प्रगती साधली असंही ते म्हणाले.