मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत करावी अशी मागणी भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते देवेन्द्र फडणवीस यांनी राज्यपालांना केली आहे. त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली.

अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, तत्काळ निधी वितरित करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी फडणवीस यांनी यावेळी केली. त्यावर लगेच कारवाई करु अशी ग्वाही राज्यपालांनी दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब रुग्णांना दिलासा दिला जातो. या निधीचं संचालन राज्यपाल कार्यालयातर्फे करण्यात यावं. पण एकही गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेणं आवश्यक आहे, अशी विनंतीही फडणवीस यांनी केली. यावरही  तत्काळ कार्यवाहीचं आश्वासन राज्यपालांनी दिल्याचं ते म्हणाले.