नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या दोन भारतीयांशी राजदूतांच्या माध्यमातून बोलू द्यावं अशी मागणी भारतानं पाकिस्तानकडे केली आहे. या दोघांची विनातोशीष पाठवणी करावी, अशी मागणी केल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी नवी दिल्लीत बातमीदारांना सांगितलं.

प्रशांत वैंदम आणि धारिलाल अशी या दोघांची नावं असून नजरचुकीनं त्यांनी हद्द ओलांडल्याचं रविश कुमार म्हणाले. पाकिस्तानी प्रचार धुरळयात या दोघांचा हकनाक बळी जाऊ नये, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून कर्तारपूर मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणावर तीर्थयात्री करत आहेत, विशेष करुन शनिवार-रविवारी या मार्गाचा वापर जास्त होतो.

दोन्ही राष्ट्रांच्या अधिकार्‍यांच्या चर्चेनंतर या सुविधेसाठी द्विपक्षीय करार झाल्याचंही रविश कुमार यांनी सांगितलं.