नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं, सामाजिक सशक्तीकरण आणि देशाच्या एकतेला चालना देणारे अनेक विकासाभिमुख निर्णय, गेल्या सहा महिन्यांच्या काळात घेतले, अशी माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून दिली आहे.

समृद्ध आणि प्रगतिपथावरचा नवा भारत घडवण्यासाठी अशा प्रकारचे आणखी निर्णय आगामी काळात घेण्याचा सरकारचा विचार आहे, असंही मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या ध्येयानं तसंच देशातल्या १३० कोटी नागरिकांच्या आशिर्वादामुळेच सरकारला प्रेरणा मिळते, आणि हे सरकार यापुढेही देशातल्या नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी नव्या जोमानं काम करत राहील, असंही मोदी यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला पुन्हा सत्तेवर येऊन सहा महिने झाल्याच्या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. मंदावलेल्या आर्थिक स्थितीतून मार्ग काढण्यासाठी सरकार अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची सर्वांगीण प्रगती होत असून, भारत हे जगाच्या आकर्षणाचं केंद्र बनल्याचं जावडेकर यांनी सांगितलं.