नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या दुर्गम आणि प्रादेशिक भागांशी अधिक जास्त प्रमाणात संपर्क वाढवण्यासाठी उडान अर्थात देशाच्या सामान्य नागरिकाला उड्डाणाची संधी या योजनेच्या चौथ्या टप्प्याची कालपासून सुरुवात झाली.

या टप्प्यात ईशान्य भाग, डोंगराळ राज्य, जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि बेटांच्या प्रदेशांवर भर दिला जाणार आहे, अशी माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं दिली आहे. दळणवळण सुविधा कमी प्रमाणात आणि अजिबात नसलेल्या भागांमध्ये अस्तित्त्वात असलेल्या धावपट्ट्या आणि विमानतळांचं पुनरुज्जीवन करून या भागांशी संपर्क प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं ऑक्टोबर २०१६ मध्ये ही योजना सुरू केली होती.

या योजनेंतर्गत  सरकारनं गेल्या ३ वर्षात तीन वेळा बोली प्रक्रिया राबवली होती आणि ७०० मार्ग सुरू केले होते. पुढल्या ५ वर्षात १००० मार्ग आणि १०० हून जास्त विमानतळ कार्यान्वित करण्याचं मंत्रालयाचं उद्दिष्ट आहे.