पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या घरकुल योजनेअंतर्गत 2014 पर्यंत 6 हजार 720 घरांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 6 हजार 530 घरकुलांचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे, या 6 हजार 530 घरांसाठीचा निधी परत गेला आहे. महापालिकेने घरकुलांचे काम वेळेत पूर्ण न केल्याने लाभार्थींना नाहक त्रास सहन करावा लागला. याबाबत अँँड. सुभाष गुट्टे यांनी उच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वस्त घरकुल योजनेचा अनेक बोगस लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. मात्र खरे गरजू नागरिक या योजनेपासून वंचित राहिले आहेत. यासाठी या योजनेची चौकशी करण्याची मागणी निवृत्त न्यायाधीस अँँड. सुभाष गुट्टे यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेने घरकुल योजनेसाठी 13 हजार 250 नागरिकांकडून अर्ज मागवले होते. त्यातील 6 हजार 720 जणांना याचा लाभ मिळाला आहे. उर्वरित लाभार्थ्यांना प्रत्येकी सहाशे रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला आहे. घरकुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. या संदर्भात चौकशी करून गरजूंना घरे देण्याबाबतची मागणी केली होती. ती पूर्ण न झाल्याने 142 लाभार्थ्यांनी ऍड. सुभाष गुट्टे यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.