नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या सहा वर्षात पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार केला आहे, असं मत केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रधानमंत्री पदाच्या काळात केलेल्या कार्यावर आधारित कर्मयोद्धा ग्रंथ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते काल नवी दिल्लीत बोलत होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात शेती, आरोग्य आणि उद्योग क्षेत्रांसह अनेक क्षेत्रांमध्ये क्रांतीकारक बदल घडले असंही ते म्हणाले.

नरेंद्र मोदी सरकारनं राजकारणातून तुष्टीकरण, जातीयवाद आणि घराणेशाही हद्दपार केली असंही ते म्हणाले. या तीन गोष्टींनी देशाच्या राजकारणाला कमकुवत केलं होतं असंही ते म्हणाले.

सरकारनं कलम ३७०, अयोध्या प्रकरण, तिहेरी तलाक आणि स्थलांतरीतांच्या नागरिकत्व या विषयात धाडसी पावलं उचलली असल्याचही त्यांनी सांगितलं.