मुंबई : पुणे महानगर परिसराच्या विकासासाठी असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करावे. विकास प्रकल्पांची कामे करताना महापालिकेच्या समन्वयातून त्याची अंमलबजावणी करावी. शहराचे सौंदर्य देखील जपावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केल्या.

मंत्रालयात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पुणे महानगर प्रदेश शहरीकरणाचा आढावा घेण्यात आला. परिवहन, सामाजिक, पायाभुत सुविधा, पर्यावरण विषयक प्रकल्प आणि नगरविकासाचे नियोजन याबाबतचा मुलभूत प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला. पुणे महानगर परिसराचा सर्वंकष वाहतूक आराखडा मांडण्यात आला. पुण्यात सध्या चार चाकी आणि दूचाकी वाहनांचा वापर 71 टक्के असून तो सार्वजनिक वाहतूक सुविधांच्या माध्यमातून कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.

सर्वंकष वाहतूक आराखड्याची चार टप्प्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. तातडीच्या उपाययोजनेमध्ये पहिल्या तीन मेट्रो मार्गीका कार्यरत करण्यात येणार आहेत. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी मेट्रोसाठी भूसंपादन, वर्तुळाकार बाह्य वळण रस्ता, पाणी पुरवठा योजना, विकास आराखडा, प्रादेशिक योजनांचा आराखडा, नगररचना योजना, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, परवडणारी घरे याबाबत आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पुणे महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त विक्रमकुमार यावेळी उपस्थित होते.