मुंबई : आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या 188 व्या पुण्यतिथीनिमित्त आज मंत्रालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली

आमदार मानसिंग नाईक, आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, उपाध्यक्ष बाळेश नाईक, यांच्यासह राज्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रामोशी व बेरड समाजाच्या विविध मागण्याबाबतचे निवेदन समाजाच्या वतीने श्री. मुंडे यांना देण्यात आले.

उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाने काही मागण्या केल्या आहेत. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन श्री. पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले.

यावेळी सामाजिक न्यायमंत्री श्री. मुंडे म्हणाले, स्वातंत्र्यानंतरही रामोशी, बेरड हा समाज उपेक्षित जीवन जगत आहे. ज्या क्रांतिवीरांने भारताच्या स्वातंत्र्यासाठी पहिले बलिदान दिले. तो समाज आज सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनापासून उपेक्षित आहे. रामोशी समाज हा भटका समाज असून मीही या भटक्या समाजातून येतो. त्यामुळे त्यांच्या समस्यांची जाणीव मला आहे. या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.